पत्राला जोडावी म्हणतोय कोरी पानं थोडीशी..
अन करेन म्हणतोय त्यावर एक कविता कोरीशी ..!!
अगदी ओठांवर अलगद येऊन थांबलेली..
आठवांनी आपल्या नखशिखांत सजलेली ..!!
'श्री' च्या जागी सजवेन चंद्र तुज्या बिंदीचा ..
रंग भरेन त्यात वाट पाहणा-या मेंदीचा .. !!
जिथे लिहितात 'प्रिय' तिथे माझे ओठ टेकवेन ..
अन चोरट्या 'त्या' क्षणांना, तुला पुन्हा भेटवेन..!!
'पत्रास कारण' म्हणून एक फूल पाठवेन मोग-याचं..
जे जपून ठेवलंय कधीचं तू माळलेल्या गजा-याचं ..!!
'मायन्या'मध्ये कविता लिहीन अन ठेवेन एक कळी ..
अन त्यात स्वल्पविरामासारखी मांडेन तुझी खळी..!!
शेवट करताना चारोळ्या टाकेन खास खास ..
मिठी बिठी शब्द वापरून देयीन हलकासा भास ...
नेहमीप्रमाणे 'तुझा' च्या पुढे नाव लिहीन माझं च ..
कारण तू मात्र नक्की मनात म्हणशील माझाच !!
आता या पत्रावर तुझा पत्ता लिहावा म्हणतोय ...
'पत्त्या'च्या जागेवर सये काळीज काढून ठेवतोय !!
ता. क.
नेहमीप्रमाणे 'तुझा'च च्या पुढे नाव लिहीन विनायक ..
अन तू लाडिक रागाने मनात वाचशील नालायक ..
Mast..!
ReplyDeleteआता या पत्रावर तुझा पत्ता लिहावा म्हणतोय ...
ReplyDeleteपत्त्याचा जागेवर सये काळीज काढून ठेवतोय !!>>>>>> apratim
आता या पत्रावर तुझा पत्ता लिहावा म्हणतोय ...
ReplyDelete'पत्त्या'च्या जागेवर सये काळीज काढून ठेवतोय !!.. खूपच सुंदर..